मुख्यमंत्री सहाय्यता निधीत सहृदयींच्या प्रतिसादाने दोन दिवसात 20 कोटींहून अधिकची भर 

Share this News:

मुंबई, दि. 15/8/2019 : राज्यात पूरामुळे ओढवलेल्या आपत्तीत पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान देण्याचे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यामुळे या निधीत योगदान देण्यासाठी अनेक अनेकविध सहृदयी सरसावले आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांत वीस कोटी रूपयांहून अधिक निधी जमा झाला आहे.

 

राज्यभरातून विविध सामाजिक संस्था, औद्योगिक क्षेत्रातील घटक, व्यावसायिक, त्यांच्या संस्था-संघटना, लोकप्रतिनिधी, नागरिकांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत प्रत्यक्ष जमा करणे किंवा पाठविणे सुरू केले आहे. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. व्यक्तिगत स्वरुपाच्या काही हजारांपासून, सामुहिकरित्या एकत्र केलेल्या लाखों रुपयांपर्यंतची मदत सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा ओघ सुरु झाला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने दिलेल्या माहितीनुसार या निधीत योगदान देणारे विविध घटक असे, सैफी फाऊंडेशनकडून एक कोटी रुपये,सारस्वत बँकेच्या वतीने एक कोटी रुपये, आकाश इन्स्टिट्युटच्या वतीने 51 लाख रुपये, अलॉन्सन प्रायव्हेट लिमिटेड कडून 50 लाख रुपये, इन्फ्राकन्स्ट्रक्शन लिमिटेडकडून 25 लाख रुपये,  सदगुरू श्री. साखर कारखाना यांच्या वतीने 22 लाख रुपये, लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून 25 लाख रुपये, मर्सिडीज बेंझ कंपनीच्या वतीने 25 लाख रुपये आणि कंपनीतील कर्मचाऱ्यांच्या वतीने तीन लाख 60 हजार रुपये,  खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्याकडून25 लाख 52 हजार 852 रुपये, भारतीय जनता पार्टी, मुंबई उत्तर पश्चिम विभागाच्या कडून 21 लाख रुपये, बोरीवली मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या वतीने 25 लाख रुपये,  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या वतीने सतरा लाख 72 हजार रुपये,  आमदार मनिषा चौधरी यांच्या मतदार संघातील विविध संस्था संघटना आदींकडून 15 लाख, 43 हजार रुपये, सुगी समुहाचे निशांत देशमुख यांच्याकडून 11 लाख रुपये, महाराष्ट्र मत्स्योद्योग विकास महामंडळाकडून दहा लाख रुपये, भाजपच्या उत्तर पुर्व विभागाक़डून दहा लाख रुपये, व्हॅल्यूएबल ग्रुपकडून दहा लाख रुपये, संजय शिंदे यांच्याकडून 11लाख रुपये, विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आणि कारखान्याच्या कर्मचाऱ्यांकडून 10 लाख 4 हजार रुपये, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था धुळे यांच्या वतीने सात लाख 77 हजार रुपये तर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत केले यांच्या वतीने 1 लाख 11 हजार रुपये, मुलुंडच्या प्रेरणा युवक ट्रस्टकडून पाच लाख रुपये,  एस नरेंद्रकुमार आणि कंपनीकडून पाच लाख रुपये, फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज कडून पाच लाख रुपये, एस. आर. भल्ला आदींकडून पाच लाख रुपये, मराठवाडा लोकविकास मंचकडून पाच लाख रुपये, खासदार कपिल पाटील यांच्याकडून पाच लाख रुपये, मुलुंड सेवा संघाकडून एक लाख पंचवीस हजार रुपये, फ्युएल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष केतन देशपांडे यांच्याकडून साडेतीन लाख रुपये, याच संस्थेचे मुख्य प्रवर्तक संतोष हुरलीकोप्पी यांच्याकडून अडीच लाख रुपये, आमदार भारती लव्हेकर यांच्या पुढाकारातून जमा करण्यात आलेले २ लाख ७१ हजार १०० रुपये, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांच्याकडून १ लाख ५० हजार रुपये, सेव्हिलीयर क्लिनिकल सप्लाईज सर्व्हिसेसकडून १ लाख ११ हजार रुपये, हेतल गाला यांच्याकडून १ लाख ११ हजार रुपये, योगेश कटारिया यांच्याकडून १ लाख १ हजार रुपये, सन्नी सानप यांच्याकडून १ लाख रुपये, शकुंतला ठक्कर यांच्याकडून १ लाख रुपये, बांद्रा पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून १ लाख रुपये,खार दांड्यातील दांडा कोळी समाजाकडून १ लाख रुपये. यासह अनेक लोकप्रतिनिधीं, उद्योजक, व्यावसायिक,त्यांच्या संघटना विविध संस्था-संघटना,  मान्यवरांकडून निधीसाठी धनादेश स्वरुपात योगदान देण्याचा ओघ सुरुच आहे.

 

साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या पुरस्काराची ५० हजार रुपयांची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

 

पूरग्रस्तांना दिव्याज फाउंडेशनकडून मदत साहित्याच्या ट्रकला मुख्यमंत्र्यांकडून हिरवी झेंडी

दरम्यान आज दिव्याज फाउंडेशनच्या वतीने सांगली,कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी स्कूल बॅग, सॅनिटरी नैपकिन, सतरंजी आणि टॉवेल असलेले ट्रक येथून रवाना झाले. त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी दिव्याज फाउंडेशनचे कविन शाह आणि सदस्य उपस्थित होते.