मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदतीचा ओघ सुरू, एकाच दिवसात सुमारे चौदा कोटींचा निधी
मुंबई, दि. 13/8/2019 : राज्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले असून राज्यभरातून विविध सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, सामान्य नागरिकांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत जमा होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या मदतीच्या आवाहनाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद म्हणून नारडेको-क्रेडाई-एमसीएचआय हे बांधकाम व्यावसायिक सांगली जिल्ह्यातील भिलवडी हे गाव पुनर्बांधणीसाठी दत्तक घेणार आहेत.
बांधकाम व्यावसायिकांच्या या निर्णयाचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्वागत केले आहे. पूरग्रस्त भागात पुनर्वसन आणि पुनर्बांधणी वेगाने व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागात वेगाने पुनर्बांधणी व्हावी यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. पूरग्रस्त गाव अनेक घटकांनी दत्तक घेऊन, तिथे पुनर्बांधणीची तयारी दर्शविली आहे. या गावांचे अत्याधुनिक पद्धतीने पुनर्वसन व्हावे. यामध्ये केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून विशेष सहकार्य देऊ केले आहे. त्यामुळे रहिवाशी क्षेत्र आणि घरांच्या पुनर्बांधणीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि सोयी सुविधांचा समावेश करण्यात यावा, असा आग्रह आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. बांधकाम व्यावसायिकांनी त्या-त्या भागात जाऊन आपत्तीला तोंड देऊ शकणाऱ्या बांधकाम तंत्राबाबत स्थानिकांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली.
पूरग्रस्त भागाच्या पुनर्बांधणीसाठी स्थानिक तरूण स्थापत्य अभियंत्यांना सोबत घेऊन, त्यांना प्रशिक्षित करून पुनवर्सन आणि पुनर्बांधणीला वेग देण्याचा प्रयत्न असल्याची माहितीही देण्यात आली.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दिलेल्या माहितीनुसार आज दिवसभरात क्रेडाई- एमसीएचआय बांधकाम व्यवसायिक संघटनेकडून दोन कोटी, नारडेको संघटनेकडून एक कोटी रुपये, वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्याकडून एक कोटी, हरमन फिनोकेम लिमीटेडकडून ५१ लाख, शोगिनी टेक्नोक्रॅट प्रा. लि. ५१ लाख, बडवे इंजिनियरर्स ५० लाख, राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ५० लाख, महाराष्ट्र राज्य माथाडी कामगार आणि जनरल कामगार युनियन यांच्याकडून ५० लाख, औरंगाबाद कृषी उत्पन बाजार समितीकडून अकरा लाख, अर्बन फाऊंडेशन २५ लाख, दि वाई अर्बन को-ऑप बँक २५ लाख, दि हिंदुस्थान को-ऑप बँक १० लाख, जनसेवा सहकारी बँक २५ लाख, छत्रपती संभाजी राजे साखर उद्योग १० लाख ५१ हजार, दि सुगी ग्रुप कडून 11 लाख, अण्णासाहेब पाटील माथाडी कामगार पतपेढी १० लाख, नेस्को १० लाख, अथर्व एज्यूकेशन ट्रस्ट १० लाख, चिंचपोकळी सार्वजनिक मंडळाकडून पाच लाख, फ्यूल इंस्न्ट्रुमेंट आणि इंजिनियर्स यांच्याकडून एक कोटी, महाराष्ट्र राज्य तलाठी संघ यांचे एक दिवसाचे वेतन, अर्बन फौंऊडेशन 25 लाख, आमदार नरेंद्र पवार यांचे एक महिन्याचे वेतन, अथर्व एज्यूकेशन ट्रस्ट दहा लाख, आण्णासाहेब पाटील माथाडी कामगार यांच्याकडून दहा लाख, बडवे इंजिनिअरींग 50 लाख, महिला व बालविकास राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्याकडून एक महिन्याचे वेतन, नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांच्याकडून दीड लाख रुपयांचा धनादेश, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून एक लाख रुपये अशा यांच्यासह विविध संस्था, संघटना मान्यवरांकडून मदतीचे हात पूरग्रस्तांसाठी पुढे आले आहेत.