उद्या कोणीही घराबाहेर पडू नये, जनता ‘कर्फ्यू’ला प्रतिसाद द्या : विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर

Share this News:

पुणे,दि.21/03/2020-कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव पाहता हा मानवजातीच्या विरोधातला लढा आहे. आपण सर्वजण मिळून हा हल्ला परतवून लावू शकतो. मात्र प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. तथापि, काही खाजगी व्यक्ती व संघटना आय.टी.कंपन्यांमध्ये जाऊन गोंधळ घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. तेव्हा कोणीही कायदा हातात घेऊ नये. त्यासाठी प्रशासन सक्षम असून सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
दि.22 मार्च रोजी ‘जनता कर्फ्यू’ चे आवाहन केले आहे. यादिवशी आपत्कालीन यंत्रणा वगळता सर्वांनी घरामध्ये थांबून प्रतिसाद द्यावा, असे सांगून ते म्हणाले, आज पुण्यात दोन जणांचे पॉझिटिव्ह आले असून आतापर्यंत पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या रुग्णांची संख्या 23 झाली आहे. कोरोना प्रतिबंधासाठी शासन व प्रशासन विविध उपाययोजना करीत आहे.
ग्रामीण भागातही अद्ययावत यंत्रणा उभी करण्यात येत आहे. ब्लड बँकांमध्ये पुरेसा रक्तसाठा उपलब्ध होण्यासाठी रक्तदात्यांनी वैद्यकीय तपासणी करुन घेऊन गर्दी होणार नाही, याची दक्षता घेऊन रक्तदान करावे. प्रशासन सेवानिवृत्त वैद्यकीय अधिका-यांची माहिती घेत असून आवश्यकता भासल्यास त्यांची सेवा उपलब्ध करुन घेण्याबाबत विचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
या विषाणूचा प्रार्दूभाव रोखण्यासाठी नागरिकांनी घरी थांबून तसेच सामाजिक शिष्टाचार पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. घरी क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या आदेशांचे पालन करुन घराबाहेर पडू नये. या सूचनांचे पालन न करणा-यांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना विरुध्दचा हा लढा काळजीपूर्वक व जोमाने लढणे आवश्यक असून पुणेकर जनता यापुढेही प्रशासनाच्या सूचना पाळून निश्चितच सहकार्य करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये, यासाठी आय.टी. क्षेत्रातील उद्योग कमीत-कमी कर्मचा-यांच्या उपस्थितीत सुरु ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यापुढे या आणखी कमी कर्मचा-यांमध्ये काम सुरु ठेवून त्यांच्या निवासाची, जेवणाची व्यवस्था कंपनी परिसरात उपलब्ध करुन दिल्यास येण्या-जाण्याच्या मार्गातील गर्दी टाळता येईल. एस.टी. बसेसच्या फे-या कमी करण्यात आल्या असून नागरिकांनी बसस्थानके व रेल्वेस्थानकावरील गर्दी टाळावी.
जिल्हाधिकारी राम यावेळी म्हणाले, बँक व एल.आय.सी. आस्थापनांमध्ये 50 टक्के कर्मचा-यांमध्ये काम करण्यात येत आहे. शासकीय रुग्णालयांबरोबरच आवश्यकता भासल्यास खाजगी रुग्णालयांची देखील मदत घेण्यात येईल , यासाठी रुग्णालयातील खाटा व अतिदक्षता विभाग राखीव ठेवण्याच्या सूचना खाजगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत. सध्या प्रशासनाकडे व्हेंटिलेटर, अतिदक्षता विभागातील सुविधा, औषध साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. तसेच या साधनसामुग्रीच्या खरेदीसाठी निधीची कमतरता पडणार नाही, याची दक्षता घेतली जात असून जिल्हा वाषिक योजनेच्या निधीतील ५ टक्के निधी यासाठी खर्च करण्याचे अधिकार जिल्हाधिका-यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी न करता दक्षता घ्यावी. क्वारंटाईन करण्यात आलेले व्यक्ती बाहेर फिरताना आढळल्यास प्रशासनाला माहिती द्यावी, असेही त्यांनी सूचित केले.