दर्याभवानी’ द्वारे रोमांचक सागरी युध्दाचा थरार २४ ऑगस्ट रोजी पुण्यात

Share this News:

19/8/19, पुणे :

इंग्रजांना हवे असलेले खांदेरी बेट श्रीशिवछत्रपतींच्या आरमाराने समुद्रातील ज्या युध्दात ताब्यात ठेवले, त्या इ स १६८० मधील युद्धाचा ऐतिहासिक थरार ‘दर्याभवानी ‘ या नाटकाद्वारे मराठी रंगभूमीवर आला असून २४ ऑगस्ट रोजी पुण्यात प्रयोग होणार आहे .

मुंबई आणि अलिबागच्या मध्ये खांदेरी बेट (जलदुर्ग) लागते.इ स १६८० मध्ये श्रीशिवछत्रपतींच्या मावळ्यांनी हे बेट इंग्रजांकडून सागरी युद्धात जिंकून घेतले.इंग्रज विरुद्ध मराठे या सागरी युद्धाचा थरार म्हणजे दर्याभवानी हे नाटक आहे .यात चाळीस कलाकारांच्या संचात नृत्य.,नाट्य आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात पहील्यादाच प्रत्यक्ष दोन जहाजांमधील इंग्रज आणि मराठे यांचे युद्ध रंगमंचावर येत आहे.

उर्वीजा थिएटर (मुंबई) निर्मित ‘ दर्याभवानी ‘ हे ऐतिहासिक नाटक रसिकांना पुण्यात प्रथमच पाहायला मिळणार आहे .४० जणांच्या संचातील भव्य नाट्य प्रयोग २४ ऑगस्ट २०१९ शनिवार रात्रौ ९ वा बालगंधर्व रंगमंदिर पुणे येथे होणार आहे .निर्माते सौ कालिका विचारे,संदीप विचारे यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या महानाटयाचे लेखन आणि गीत लेखन संदीप विचारे यांनी केले आहे. दिग्दर्शन डॉ. अनिल बांदिवडेकर, यांचे आहे. नेपथ्य प्रसाद वालावलकर , तर संगीत मनोहर गोलांबरे यांचे आहे. नृत्य रचना सचिन गजमल यांच्या आहेत.वेशभुषेची जबाबदारी मोहिनी टिल्लू, कलिका विचारे, गणेश मांडवे यांनी सांभाळली आहे .यातील गाणी आदर्श शिंदे (गोंधळ) नंदेश उमप (पोवाडा) प्रा.गणेश चंदनशिवे (वासुदेव गीत) यांनी गायली आहेत. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे .

या नाट्याचे नायक मायनाक भंडारी हे दर्यासारंग यांच्या बरोबरीने स्वराज्य आरमाराचे सुभेदार होते. इ.स.१६८० चे सुमारास महाराजांनी सागरी शत्रूंना थोपविण्यासाठी मुंबई बंदराच्या तोंडाशी असणाऱ्या खांदेरी-उंदेरी बंदरावर किल्ला बांधण्याचा ठरविला. त्यादृष्टीने राजाच्या वेगाने हालचालीही सुरु झाल्या .मुंबई बेटावर नजर ठेवून सागरी शत्रूंच्या हालचालींना प्रतिबंध करण्याची राजांची या मागची योजना होती. शिवाजी महाराजांच्या या हालचालीने इंग्रज प्रचंड धास्तावले आणि त्यांचा हा हेतू तडीस जाऊ नये म्हणून इंग्रजांनी खांदेरी-उन्देरीवर आपला हक्क दाखवीत महाराजांशी उघड उघड युद्ध पुकारले.कॅप्टन विलियम मिन्चीन, रिचर्ड केग्वीन, जॉन ब्रान्डबरी, फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटी त्यांनी पाठवल्या होत्या.मायनाक भंडाऱ्यांनी अतिशय पराक्रमाने आणि चिवटपणाने प्रखर संघर्ष मांडीत इंग्रजांचा हा मनसुबा हाणून पाडला.

या युद्धात इंग्रजांना मदत करण्या करता जंजिऱ्याचा सिद्धी पण येतो या दोघांच्या म्हणजे सिद्दी आणि इंग्रज यांच्या आरमराला थळच्या समुद्रात मायनाक भंडारी आणि दौलतखांच्या नेतृत्वाखाली मराठे पाणी पाजतात आणि विजयश्री खेचून आणतात.. हा सर्व थरार ‘दर्या भवानी ‘ द्वारे रंगमंचावर पाहायला मिळणार आहे .

‘ऐतिहासिक नाटक मोठ्या संचात रंगभूमीवर आणणे हे आव्हान असून आम्ही ते यशस्वीपणे पेलले आहे .स्वराज्याच्या इतिहासातील एक अद्भुत समरप्रसंग रसिकांना पाहायला मिळणार आहे ‘,असे संदीप विचारे यांनी सांगितले .’ऐतिहासिक नाटकांची निर्मिती ही दुर्मिळ बाब असल्याने रसिकांना बऱ्याच दिवसांनी ते पाहायला मिळणार आहे ‘ असे या नाटकाचे पुण्यातील आयोजक ‘मनोरंजन’ संस्थेचे मोहन कुलकर्णी यांनी सांगितले.