कृषीपंपांना सौर ऊर्जेद्वारे वीज देण्यासाठी निविदा प्रक्रिया प्रारंभ
महाराष्ट्र शासनाच्या ” मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजने ” अंतर्गत राज्यातील कृषीपंपाना सौर ऊर्जेद्वारे दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत महावितरण कंपनीने कृषी प्राबल्य असलेल्या 20 जिल्हयातील सुमारे 218 तालुक्यात 2 मेगावॅट ते 10मेगावॅट इतक्या क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी स्पर्धात्मक निविदा काढली आहे. या प्रकल्पाची एकूण क्षमता अंदाजे 1000 मेगावॅट असून तालुकानिहाय 10 मेगावॅट व जिल्हानिहाय 50 मेगावॅट अशी मर्यादा विहित केलेली आहे. ही निविदा महावितरणचे संकेतस्थळ “www.mahadiscom.in“
या योजनेंतर्गत सौर ऊर्जेचे छोटे प्रकल्प महावितरणच्या उपकेंद्राशी 22 किव्हो किंवा 11 किव्होवर जोडण्यात येणार असून त्यामुळे महावितरणच्या वितरण व्यवस्थेवरील भार कमी होऊन विजहानी कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच नविन पायाभूत सुविधांची आवश्यकता कमी होण्यासही मदत होईल. या योजनेत ग्रामीण भागातील सौरऊर्जा प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या विजेमुळे कृषी वाहिनीद्वारे शेतीपंपांना दिवसाच्या वेळेस वीज उपलब्ध करुन देण्यास उपयोगी ठरेल. तसेच महावितरण कंपनीस नुतनशील वीजखरेदी बंधनाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मदत होणार आहे.
या निविदा प्रक्रियेत सर्व सौर ऊर्जा प्रकल्प विकासकांनी जास्तीत जास्त संख्येत सहभागी व्हावे असे आवाहन महावितरण कंपनीतर्फे करण्यात येत आहे.
