सी आय एस एफ जवानांच्या प्रामाणिकपणामुळे विमानतळांवर विसरलेले पाकीट मिळाले
….
दर वर्षी विमानतळावरील गहाळ शेकडो वस्तू मिळतात मूळ मालकांना – श्री अनिल ठाकूर …
आम्ही आमचे कर्तव्य करतो – इन्स्पेक्टर प्रवीणकुमार …
काल दिनांक १२ फेब्रुवारी ला सकाळी ११ वाजता जेट एयरवेज च्या विमानाने पुणे ते दिल्ली प्रवास नियोजित होता.सिक्युरिटी चेकिंग च्या वेळी अंगावरील कोट काढून ठेवला,नवीन नियमानुसार तेथील सी आय एस एफ च्या जवानाने खिशातील वॉलेट /पैश्याचे पाकीट काढून ठेवण्यास सांगितले,मी पाकीट काढले असता जवानाने एका ट्रे मध्ये माझा कोट व त्यावर पाकीट ठेवले,मात्र स्क्रिनिंग करून बाहेर येताना नुसता कोट हा बेल्ट वर आला व मी ही गडबडीत कोट उचलला आणि तसाच विमानात बसलो.दिल्लीत उतरल्यावर खिश्यात पाकीट नसल्याचे लक्षात आले.पाकिटात वीस हजार रुपये,ए टी एम कार्ड,ड्रायविंग लायसन्स,पॅनकार्ड,व अन्य वस्तू होत्या.मी तेथून विमानतळावरील माझे मित्र वैभव पोमण यांना तसेच टर्मिनल मॅनेजरला मोबाईल वर संपर्क करून घडलेला प्रकार सांगितला व त्यांनी त्वरित धाव घेऊन स्क्रिनिंग मशीन वरील जवानांशी संपर्क साधल्याचे समजले.त्यानंतर सायंकाळी ७ पर्यंत कोणाशीच संपर्क होऊ शकला नाही,माझे मित्र जयंत येरवडेकर हे ही अधिकाऱ्यांशी सतत संपर्कात होते,अखेर सायंकाळी ७ वाजता माझे पाकीट सुरक्षित असून विमानतळावरून ओळख पटवून घेऊन जाण्याचा निरोप आला आणि जीव भांड्यात पडला.पैश्यापेक्षाही त्यातील पॅनकार्ड,लायसन्स व ए टी एम कोड चे पिन नंबर यांची चिंता जास्त होती.रात्री १२:३० वाजता विमानतळावर उतरल्यावर तेथील कार्यालयात माझे पाकीट ओळख पटवून सुपूर्द करण्यात आले,आनंदाची गोष्ट अशी की तेथील रजिस्टर मध्ये पाकिटातील एकूण एक गोष्टी नोंदविल्या होत्या व माझे पाकीट जसेच्या तसे मिळाले.
आज सकाळी एयरपोर्ट मॅनेजर अनिल ठाकूर यांना संपर्क केला असता ” आमच्याकडे सापडलेले दहा रुपयेसुद्धा मूळ मालकाला परत मिळतात,साधारण ८०% लोकांना त्यांच्या विसरलेल्या व गहाळ झालेल्या वस्तू पोच होतात,आम्ही ही त्या वस्तूंमधील संपर्क क्रमांक किंवा इतर खुणेवरून मालक शोधण्याचा प्रयत्न करत असतो,ज्या वस्तूंचे मालक सापडत नाहीत त्या वस्तू सरकार कडे म्हणजे अर्थ खात्याकडे जमा केल्या जातात.येथील सी आय एस एफ चे इन्स्पेक्टर प्रवीण कुमार यांना आभार मानण्यासाठी फोन केला असता ते म्हणाले ” लोकांना त्यांच्या वस्तू परत मिळणे हे महत्वाचे आहे,आमचे सर्व जवान प्रामाणिक असून देशाप्रती समर्पित आहेत,लोकांच्या फक्त पैश्याचा मोल असतो असे नाही तर अनेक वस्तूंमध्ये भावना ही गुंतलेल्या असतात,त्यामुळे आम्ही प्रत्येक वस्तू जमा करतो आणि ती मूळ मालकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतो.लोकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आमच्यासाठी सर्व काही असून,तुमच्या सारखे लोक जेव्हा कौतुकाचा फोन करतात त्यात आम्हाला सगळे मिळते असे ही ते म्हणाले.”
आजच्या काळात जेव्हा आपण सगळेच वाईट आहे असे गृहीत धरतो तेव्हा असे सुंदर अनुभव मन प्रसन्न करून जातात.
