हे सरकार बळीराजाचे नाही तर कसायाचे – सुनील तटकरे

Share this News:

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारचा पहिला अर्थसंकल्प शेतकऱ्यांना समर्पित केला होता. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या आहेत का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उपस्थित केला. कर्जमाफीच्या अर्जात जर शेतकऱ्यांनी चुकीची माहिती दिली तर शेतकऱ्यांवर फौजदारी करू असे म्हणणारे हे सरकार बळीराजाचे नसून कसायाचे सरकार आहे अशी टीका त्यांनी सरकारवर केली. चंद्रपूर येथे पक्षाच्या कार्यकारिणी मेळाव्याला संबोधित करत असताना ते बोलत होते.

पुढे बोलताना तटकरे म्हणाले की शेतकऱ्यांच्या शेतमालाला आधारभूत किंमत देऊ असे आश्वासन भाजपने निवडणुकांदरम्यान दिले होते, त्याचे काय झाले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजप-शिवसेनेने खोटे बोलून, आपली विचारधारा थोपवून सत्ता हस्तगत केली. पण आता त्याची पुनरावृत्ती होणार नाही, लोक सुज्ञ आहेत असेही ते म्हणाले. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी झाली असली तरी चंद्रपुरात अवैधमार्गे दारू, गांजा, ड्रग्स मोठ्या प्रमाणात विकला जातो. या धंद्याला राजकीय पाठिंबा आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी थेट पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे नाव घेत केला. आज राज्यावर मोठ्या प्रमाणात कर्ज झाले आहे, राज्यात बेरोजगारी वाढत आहे, राज्यातील कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहे अशी खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. जपानमध्ये बुलेट ट्रेन सुरक्षित नसल्याच्या बातम्या छापून आल्या आहेत. जर बुलेट ट्रेन सुरक्षित नसेल तर असली ट्रेन भारतात कशाला आणता, असा सवालही त्यांनी सरकारला विचारला.

यावेळी या मेळाव्याला माजी मंत्री अनिल देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संदिप गड्डमवार, शहर जिल्हाध्यक्ष शशिकांत देशकर, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अॅड. जयदेव गायकवाड, वक्ता प्रशिक्षण सेलचे प्रमुख प्रदिप सोळुंखे, आमदार प्रकाश गजभिये , माजी आमदार संदिप बाजोरीया, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव आणि इतर मान्यवर उपस्थित होते.