मौजे कल्याण महाराष्ट्रात आदर्श बनवणार : पालकमंत्री गिरीश बापट

Share this News:

पुणे ता. : शहराच्या जवळ असून ही या पूर्वीच्या लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे विकासापासून वंचित राहिलेल्या मौजे कल्याण (ता.हवेली) या गावाला महाराष्ट्रातील आदर्श गाव बनवणार, असे प्रतिपादन पालकमंत्री गिरीश बापट यांनी केले. शिवगंगा खोऱ्यातील कल्याण गावातील नियोजित पुलाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले यावेळी ते बोलत होते.

यावेळी खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर, पंचायत समिती सदस्य अनिरुद्ध यादव, माजी पंचायत समिती सभापती चांदाशेठ डिंबळे, सरपंच कुंदा डिंबळे, उपसरपंच अभिजित डिंबळे, शिवगंगा खोरेचे अध्यक्ष श्रीकृष्ण उर्फ सुभाष डिंबळे, मारुती डिंबळे, सुनील डिंबळे यांच्यासह मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री म्हणाले, या पूर्वी सत्तेत असणाऱ्या सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे जिल्ह्यातील अनेक खेड्यांचा विकास झाला नाही. पण आम्ही सत्तेत आल्यानंतर पालकमंत्री म्हणून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शहराच्या विकासासोबत खेड्यांचा विकास करण्यावर मी लक्ष केंद्रित केले आहे. कल्याण हे गाव सिंहगडाच्या पायथ्याला येते तरीही या गावाचा म्हणावा तसा विकास झाला नाही. या गावातील मुख्य रस्त्यावरील पूल खूप जुना झाला असल्याने खचला होता. पावसाळ्यापूर्वी हा रस्ता पूल दुरुस्त करणे गरजेचे होते. म्हणूनच या रस्त्यासाठी जिल्हा नियोजन समितीतून ७५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. सत्तेत आल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही अनेक महत्वपूर्ण योजना राबवत आहोत. शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी आम्ही रिंग रोडची निर्मिती करण्यात येणार आहे. हा रिंग रोड कल्याण जवळून प्रस्तावित असल्याने भविष्यात गावातील लोकांना रोजगार मिळेल. येणाऱ्या काळात या गावातील रस्ते आणखी रुंद आणि चांगले करू. खडकवासल्यावरून सिंहगडला जाणारी वाहतूक काही प्रमाणात जरी या मार्गावरून गेली तरीही खडकवासला भागातील वाहतुकीची कोंडी सुटेल तसेच या गावातील लोकांचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असणारा शेती उद्योग सुधारावा यातून शेतकऱ्याला अर्थार्जन व्हावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. शेतीचे उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीला पाणी देणे गरजेचे आहे. पाण्यासाठी आपल्याला पावसावर अवलंबून रहावे लागते त्यामुळे या पाण्याची साठवण व वितरण व्यवस्थित होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही तलावातील गाळ काढत आहोत तसेच नवीन बंधाऱ्यांची निर्मिती करत आहोत. ग्रामस्थांनी प्रस्ताव दिल्यास यासाठी निधीची उणीव भासू देणार नाही.

यावेळी बोलताना आमदार तापकीर यांनी माझ्या विजयात या गावाचा मोठा वाटा असून हे गाव नेहमी विकास करणाऱ्याच्या पाठीमागे उभा राहतो अशा भावना व्यक्त केल्या. तसेच या गावाच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे अभिवचनही त्यांनी दिले.