एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी मार्च २०२० पर्यंत रोडमॅप : सुधीर मुनगंटीवार

Share this News:

मुंबई दि. 29/8/2019 : राज्य अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्यासाठी शासनाने नियोजनबद्ध पाऊले टाकण्यास सुरुवात केली असून मार्च २०२० पर्यंत यासाठीचा परिपूर्ण रोडमॅप तयार होईल असा विश्वास अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळ आयोजित डॉ. डी.आर. गाडगीळ स्मृती व्याख्यानमालेतील “महाराष्ट्र: एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल” याविषयावरील पुष्प श्री. मुनगंटीवार यांनी गुंफले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमईडीसीचे अध्यक्ष रविंद्र बोराटकर, युपीएल ग्रुपचे सीएमडी आर. डी श्रॉफ, उपाध्यक्ष मीनल मोहाडीकर यांच्यासह अर्थक्षेत्रातील अनेक मान्यवर, विविध देशांचे राजदूत उपस्थित होते.

 

लघु आणि मध्यम उद्योग एक ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे सेनापती

मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून महाराष्ट्र हे देशाचे ग्रोथ इंजिन असल्याचे पंधराव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षांनी सांगितले आहे. देशाच्या ५ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी महाराष्ट्र यात २० टक्क्यांचे योगदान देणार असून यासाठी राज्याचा सध्याचा विकास दर दुप्पट होणे आवश्यक आहे. यादृष्टीने शासनाने लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योग क्षेत्राच्या सक्षमतेवर भर दिला आहे. हेच खऱ्या अर्थाने राज्याच्या एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे सेनापती ठरणार असल्याचे वित्तमंत्र्यांनी सांगितले

 

महिलांचे योगदान वाढवणार

एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान वाढवण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून वित्तमंत्री म्हणाले की, आजचे उद्योग क्षेत्रातील महिलांचे ९ टक्क्यांचे योगदान २० टक्क्यांवर नेण्याचा संकल्प राज्याच्या औद्योगिक धोरणात जाहीर करण्यात आला आहे. त्यादृष्टीने कौशल्य विकास आणि आर्थिक सक्षमतेचे मार्ग विकसित केले जात आहेत. इज ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत उद्योजकांना अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अनेक डिजिटल प्लॅटफॉर्म यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. कौशल्य विद्यापीठाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमांतर्गत यावर्षात जवळपास १० हजार लघु उद्योग सुरु करण्याचे नियोजन आहे. यात महिलांना प्राधान्य देण्यात आले आहे. राज्यात ५० तालुक्यात सुक्ष्म, लघु उद्योगांचे पार्क विकसित करण्याचा शासनाचा संकल्प आहे. यासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असून यात ३० टक्के भुखंड महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत.

 

नियोजनबद्ध वाटचाल

कोणत्याही यशासाठी अचूक आणि परिपूर्ण नियोजन आवश्यक असते हे लक्षात घेऊन १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या संकल्पासाठी वित्तविभागाने वाटचाल सुरु केली आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या तज्ज्ञांच्या समित्या स्थापन करण्यात येत असल्याची माहिती श्री. मुनगंटीवार यांनी दिली. राज्यात उत्तम दर्जाच्या पायाभूत सुविधा आहेत. माहिती तंत्रज्ञानात राज्य अग्रेसर आहे. राज्याला ७२० कि.मी लांबीचा समुद्र किनारा आहे. जंगलव्याप्त क्षेत्र आहे, गड-किल्ले आहेत, कृषी क्षेत्रासाठी आवश्यक असलेले संशोधन करण्याची क्षमता महाराष्ट्रात आहे. वैद्यकिय, अध्यात्मिक पर्यटनाच्या विपूल संधी महाराष्ट्रात आहेत. यातून मोठ्याप्रमाणात रोजगार निर्मिती शक्य आहे. आता गरज आहे एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेसाठी एक लोकआंदोलन उभे करण्याची. त्यावर शासनाने लक्ष केंद्रीत केले आहे. प्रत्येकाने डॉलरच्या तुलनेत आपला रुपया मजबूत करावयाचे ठरवले आणि स्वत:च्या उद्योग व्यवसायाची वृद्धी केली तरी आपण एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट आपण नक्की गाठू शकू असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

 

युपीएल समुहाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. श्रॉफ यांनी देशात आणि राज्यात उद्योग व्यवसायासाठी ९० च्या दशकानंतर अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचे सांगतांना आपला देश आर्थिक आणि औद्योगिक विकासात जगात वेगाने पुढे जात असल्याची माहिती दिली. युवाशक्ती ही आजच्या भारताचे शक्तीस्थान असून या मनुष्यबळाच्या माध्यमातून भारत भविष्यात आणखी नेत्रदीपक प्रगती करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

श्री. बोराटकर यांनी महाराष्ट्र आर्थिक विकास मंडळाची वाटचाल सांगतांना डॉ. डी. आर गाडगीळ यांच्या अर्थक्षेत्रातील योगदानाचा आढावा आपल्या प्रास्ताविकात घेतला.