आर्थिक क्षेत्राला पूरक सेवा देणा-या व्यवस्थांचे जाळे निर्माण करण्याची गरज – डॉ. जुनेद अहमद

Dr.Junaid-Ahmad-Country-Director-India-The-World-Bank.JPG
Share this News:
पुणे, दि. १२ जुलै, २०१८ : जगामध्ये आर्थिक परिस्थिती बदलाचे वारे सध्या वाहत आहेत, त्यामुळे भारत आणि प्रामुख्याने दक्षिण आशियायी देशांनी ही संधी लक्षात घेत व्यापक सुधारणा करण्याची गरज आहे. ही सुधारणा करीत असताना आर्थिक क्षेत्राला पूरक सेवा देणा-या व्यवस्थांचे जाळे निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे मत द वर्ल्ड बँकेचे भारतातील संचालक डॉ. जुनेद अहमद यांनी व्यक्त केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटर यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘दक्षिण आशियासाठी जागतिक विकासाच्या संधी’ या विषयावर ते बोलत होते. पुणे इंटरनॅशनल सेंटरचे संस्थापक अध्यक्ष निरंजन राजाध्यक्ष हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.

पीआयसीचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर हेही यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ. अहमद म्हणाले की, आज जागतिक परिस्थिती लक्षात घेत भारत आणि दक्षिण आशियायी देशांना विकासाची मोठी संधी आहे. अमेरिका आणि चीन यांमधील नातेसंबंधांचा विचार केला तर सध्या जी व्यापारी युद्धे चालू आहेत त्यातून भारताला विकासाची संधी आहे. याबरोबरच भारताने मालवाहतूक व्यवस्था व बंदर व्यवस्थापन यामध्ये सुधारणा करीत निर्माण क्षेत्रातील संधीचा फायदा उठविला पाहिजे. नैसर्गिक साधनसंपत्ती बरोबरच रस्ता आणि शहरांचे व्यवस्थापन यामधील वाढत्या संधीची लक्षणीय आकडेवारी लक्षात घेत भारत विकासाच्या दृष्टीने सिद्ध होऊ शकतो. याशिवाय महिला मनुष्यबळाचे प्रमाण वाढविण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न होणे आज गरजेचे आहे.

आर्थिक क्षेत्र आणि नागरी व्यवस्थेच्या सुधारणेसाठी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून त्यांना विकासाचे सर्व अधिकारी दिले गेले पाहिजेत असे मत डॉ, अहमद यांनी व्यक्त केले. आज आपल्याकडे जबाबदारी घेणारेच कोणी नसल्याने गोंधळ उडालेला पहायला मिळतो. त्यामुळे आर्थिक आणि नागरी व्यवस्थेची सुधारणा करीत असताना या क्षेत्रांना पूरक सेवा देणा-या व्यवस्थांचे जाळे निर्माण केले गेले पाहिजे असेही त्यांनी नमूद केले.

आज जगभारातील दरडोई उत्पन्नाच्या आकडेवारीची तुलना केली तर भारता एवढे दरडोई उत्पन्न असलेली देशात महिला मनुष्यबळाचे प्रमाण हे जास्त दिसून येते. आपल्या देशात महिला मनुष्यबळाला योग्य त्या सुविधा पुरवित त्यांच्या कौशल्यांचा वापर करून घेणे महत्त्वाचे आहे मात्र त्यासाठी समाजाचा महिलांबद्दलचा दृष्टीकोन व्यापक होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल, असे डॉ. जुनैद अहमद यांनी नमूद केले.