रोजगारक्षम उपक्रमांचा प्राधान्यक्रम निश्चित करून उद्योग सुरु करावेत – सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. 22 : राज्यातील सात जिल्ह्यांच्या नैसर्गिक विकासाच्या क्षमता व तिथे असलेल्या व निर्माण करता येऊ शकतील अशा रोजगार संधींचा अभ्यास कौशल्य विकास विभागाने केला आहे, त्यातील कोणते प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात प्रथम घेता येतील याचा प्राधान्यक्रम निश्चित करावा व लवकर सुरु करता येतील असे उद्योग सुरु करावेत, असे निर्देश वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
आज मंत्रालयात यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते.
वित्तमंत्री श्री.मुनगंटीवार पुढे म्हणाले, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यातील रोजगार संधीचा विकास करण्यासाठी केपीएमजी आणि पीडब्ल्युसी या कंपन्यांना नियुक्त करण्यात आले होते. त्यांनी यासंदर्भात सविस्तर अभ्यास करून अहवाल सादर केला आहे. या सात जिल्हयात गुंतवणूक वाढवतांना रोजगारक्षम उपक्रमांची आखणी करून स्थानिकांचे उत्पन्न वाढवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यात लवकर आणि सहज सुरु करता येतील अशा उद्योगांची निश्चिती करून त्या उद्योगांच्या स्थापनेला गती द्यावी, असेही ते म्हणाले.
स्थानिक पातळीवर रोजगार निर्माण करतांना ते पर्यावरणस्नेही, भौगोलिक गरजांची पुर्तता करणारे असावेत, असे निश्चित करण्यात आले आहे. त्याप्रमाणे या दोन संस्थांनी कृषी, पणन, वन, कृषीप्रक्रिया केंद्र, पशुसंवर्धन- दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वनोपज, माहिती तंत्रज्ञान, निसर्ग पर्यटन यासह इतर सर्व संबंधित क्षेत्रातील रोजगारांची निश्चिती केली आहे. स्थानिकांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या उत्पादनांचा गुणात्मक विकास, पणन व्यवस्थेची साखळी विकसित करणे, उत्पादन प्रक्रिया राबवितांना त्यात स्वच्छता आणि गतिमानता आणणे, या रोजगार संधीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांची निर्मिती करणे, शासनाच्या विविध योजनांच्या समन्वयातून योजनांच्या अंमलबजावणीला गती देणे याचा विचार यात करण्यात आला आहे.
या सात जिल्ह्यांसाठी निवडण्यात आलेल्या उद्योगांची यादी सादर करावी, त्याच्या पुर्ततेचा कालबद्ध कार्यक्रम तयार करावा अशा सूचनाही श्री. मुनगंटीवार यांनी दिल्या. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.