शाळा बंद करून डान्सबार सुरू करणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचा
बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षाच्या आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई सुळे यांचे आवाहन
दौंड, दि.९ : केंद्रसरकारकडून अनुदान आल्यानंतर ऊसाचा एफआरपी, कांदा, साखर आणि दुधाला भाव मिळतो. परंतु गेल्या पाच वर्षात केवळ फक्त खोटी आश्वासने दिली. कर्जमाफी तर मिळालीच नाही. सरकारी शाळांची गरज असताना शाळा बंद करून डान्सबार सुरू केली. हे सरकार पुर्णत: शेतकरी विरोधी असल्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचलेच पाहीजे, असे आवाहन बारामती लोकसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस पक्ष आणि मित्रपक्षाच्या आघाडीच्या अधिकृत उमेदवार सुप्रियाताई सुळे यांनी मंगळवारी पिंपळगाव येथे केले.
सुप्रियाताई सुळे पुढे म्हणाल्या, “सन १९८० च्या दशकात संपूर्ण दौंडमध्ये वीज आली होती. तसेच मतदारसंघात शाळा, वीज, हॉस्पिटल, रस्ते, हमीभाव, एमआयडीसीमध्ये कारखाने आले ही सारी यशस्वी घौडदौड आपल्यास कार्यकाळात झाली. त्यामुळे केंद्रीय मंत्री अरुण जेटली म्हणतात बारामती हे परफेक्ट मॉडेल आहे, देशात जर शंभर बारामती झाल्या तर संपूर्ण देशाचा चेहरामोहरा बदलून जाईल. नोटबंदी सारखा भयंकर निर्णय घेतला, काळापैसा तर आलाच नाही वरून २८ हजार कोटी नवीन नोटा छापायला खर्च केले. गेली ३० वर्ष लोकांना राम मंदिर बांधू असे गाजर देऊन नोटबंदीच्या काळात ६०० कोटी रुपये खर्च करून स्वतःच्या पक्षाचं प्रशस्थ ऑफिस बांधलं. सिलेंडर, डाळी, पेट्रोल ह्यांचे भाव अवाजवी वाढवले त्यातून गेल्या ५ वर्षात प्रत्येक कुटुंबाचं सरासरी एक लाखाचं नुकसान ह्या सरकारने केले आहे. आता नवीन ह्यांनी सुरु केलंय ‘मै भी चौकीदार हु’, कोणाला वाटेल कि आपल्या मुलीने किंवा मुलाने चौकीदार व्हावं, आपण चौकीदार नाही तर देशाचे मालक आहोत.’’