पाणीसाठा वाढविण्याचे ‘खडकवासला मॉडेल’ जाणार राष्ट्रीय पातळीवर केंद्रीय मंत्री उमा भारती आज करणार धरणाची पाहणी
खडकवासला ः धरणाच्या पाणीसाठ्यातील गाळ काढून त्याची साठवण क्षमता वाढविण्याचा खडकवासला धरणातील यशस्वी प्रयोग आता राष्ट्रीय पातळीवर राबविला जाणार आहे. खुद्द केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांनी या उपक्रमाची दखल घेतली असून त्याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी त्या आज (मंगळवारी) पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुण्यातील कर्नल सुरेश पाटील यांनी आपल्या ‘ग्रीन थम्ब’ या संघटनेच्या मार्फत खडकवासला धरणातील गाळ काढण्याच्या उपक्रमास सुरूवात केली. पुणे महापालिका, जलसंपदा विभाग, श्रीमंत दगडूशेठ गणपती मंडळ अशा संस्थांची त्यांना या उपक्रमात मदत झाली आहे. अनेक वर्षांपासून धरणाच्या तळाशी साठलेला गाळ काढून त्याची पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि धरणाच्या काठाशी वनीकरण करून पर्यावरण संवर्धन करणे, असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
पाच वर्षांपूर्वी सुरू झालेल्या उपक्रमातून धरणाच्या पाणीसाठ्यात जवळपास 0.25 टीएमसी इतकी वाढ झाली आहे, असे कर्नल सुरेश पाटील यांनी सांगितले. कर्नल पाटील यांच्या या उपक्रमाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मिळाली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही काही दिवसांपूर्वी खडकवासला धरणाला भेट देऊन कर्नल पाटील यांचे कौतुक केले होते. इटालीमध्ये आयोजित जलपरिषदेत कर्नल पाटील यांनी या उपक्रमाचे सादरीकरण केले होते. तसेच केंद्रीय जलसंपदा मंत्री उमा भारती यांच्या समोर खडकवासला मॉडेलचे सादरीकरण केले होते. तेव्हा काही क्षणांतच त्यांनी धरणाची पाहणी करण्याचे स्पष्ट केले. त्यानुसार त्यांचा हा दौरा होणार आहे.
“धरणातील गाळ काढल्यानंतर परिसरातील शेतकऱ्यांना तो शेतीसाठी वापरण्याकरिता दिला जातो. यातून जलक्रांती बरोबरच अर्थक्रांतीही घडत आहे. धरणाच्या काठावरील पडीक जमिनीवर वनीकरण, पक्षी अभयारण्य, उद्यान असे अनके उपक्रम आम्ही राबविले आहेत.
त्यातून परिसरातील पर्यावरणाच्या संवर्धनास मोठी मदत झाली आहे,” असे कर्नल सुरेश पाटील यांनी सांगितले. ‘ग्रीन थम्ब’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून खडकवासला धरणाची जलधारण क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न करत असून या महत्त्वाकांक्षी योजनेत तिला यश मिळत आहे.
आज देशातील लहान व मोठ्या धरणांमध्ये पावसाचे फक्त 18 ते 20 टक्के पाणी अडवले जाते. पाणी साठवण्यासाठी नवीन धरणे बांधणे परवडणारे नाही. त्यामुळे सध्याच्या धरणातील गाळ काढून त्यांचे पुनर्जीवन केल्याने शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल. लोकसहभाग आणि सरकारी मदतीच्या माध्यमातून हे काम कमी खर्चात होईल. सध्या आपल्याकडे पावसाचे सुमारे 80 टक्के पाणी समुद्रात वाहून जाते म्हणजेच वाया जाते. मात्र अशा प्रकारच्या कामांमुळे 40 टक्के पाण्याची बचत करता येणे शक्य आहे. देशभरात अशा कामांची गरज आहे. यासाठी देशभरातील दोन लाखांवर माजी सैनिक सहभागी होणार आहेत, असे कर्नल सुरेश पाटील सांनी सांगितले.
