कोल्हापूर सांगली महापुरात अडकलेल्या नागरिकांसाठी जीव धोक्यात घालून हवाईदलाचे सहाय्य

Share this News:

मुंबई, दि. 12/8/2019 : कोल्हापूर आणि सांगली येथील अभूतपूर्व अशा नैसर्गिक संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय हवाई दल, नौदल तटरक्षकदल यांनी जीवाची बाजी लावून पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठीचे विमाने व हेलीकॉपटर्स उतरवली आहेत.

हवाईदल किंवा नौदलामार्फत लष्करी विमाने उतरवण्याआधी कोणत्याही नव्या हवाईपट्टीचीं सुरक्षिततेच्या दृष्टीने निरिक्षण केले जाते. मात्र कोल्हापूर सांगलीच्या महापुरामुळे पूर्वनिरीक्षण अशक्य होते. त्यामुळे अशा पूर्व निरीक्षणाशिवाय या महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी नौदल, हवाईदल व कोस्ट गार्डच्या वैमानिकांनी धावपट्टीवर विमान आणि हेलीकॉप्टर उतरवले आहेत.

महापुरामुळे कोल्हापूरचा संपर्क केवळ हवाईमार्गेच साधता येऊ शकत होता. ही बाब लक्षात घेऊन मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी संरक्षणमंत्री श्री.राजनाथ सिंह यांना गंभीर परिस्थितीची जाणीव करुन देत हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाच्या सहायाची विनंती केली होती. त्यानुसार अत्यंत गतिने देशभरातील विविध ठिकानाहून मनुष्यबळ आणि आवश्यक साधनसामग्री हवाई मार्गाने कोल्हापूर येथे पोहचवण्यात येत आहे. पावसामुळे हवामान खराब असताना अत्यंत कठीण अशा घटांना पार करत नव्या हवाईपट्टीवर स्वत:चा जीव धोक्यात घालून भारतीय नौदल, हवाईदल आणि तटरक्षक दलांनी अजोड अशी कामगिरी बजावली आहे.

गेल्या तीन दिवसांपासून कोल्हापूर विमानतळावर हवाईदल, नौदल, तटरक्षक दलाची विमाने मदत साहित्य घेऊन पोचत आहेत. बुधवारी हवाईदल व नौदलाची 11 विमाने/हेलिकॉप्टर तर गुरुवारी 14 विमाने/हेलिकॉप्टर कोल्हापूर विमानतळावर उतरली होती. शुक्रवारी 16 वेळा विमाने/हेलीकॉप्टर्स या विमानतळावर उतरली आहेत.

या हेलिकॉप्टर विमानाने कोल्हापूर, कराड, सातारा व सांगलीमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. हवाईदल, नौदल व तटरक्षक दलाने गोवा,हुबळी, मुंबई, पुणे, भटींडा, भुवनेश्वर, विशाखापट्टणम येथून हवाई मार्गाने हेलिकॉप्टर व विमानातून विविध पथकांसह बोटी व इतर मदत सामग्री या दोन्ही जिल्ह्यांना पाठविली. त्यामुळे पुरात अडकलेल्या नागरिकांची तातडीने सुटका करणे व मदत साहित्य पोहोचविणे शक्य झाले.

मुंबई येथील कलिना व लायन गेट वरुन सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांच्या सुरक्षा व सहाय्यासाठी 12 पथके “ग्रीन कॉरिडॉर”करुन अत्यंत बिकट परिस्थितीचा सामना करत सांगलीला पाठवण्यात आले.

स्थानिक जिल्हा प्रशासन महाराष्ट्र पोलीस, एनडीआरएफ, महाराष्ट्र सुरक्षा दल सुध्दा नागरिकांच्या मदत आणि सहाय्यासाठी मोलाची भूमिका बजावत आहे.