महावितरणकडून ‘वाॅलेट’द्वारे रोजगाराची संधी

Share this News:

बारामती, दि. 18 जुलै 2019 : महावितरणने वीजबिल भरण्याच्या वाॅलेटद्वारे रोजगाराची संधी निर्माण केली असून वाॅलेटद्वारे वीजबिलांचा भरणा केल्यास प्रती पावतीमागे 5 रुपये कमिशन देण्यात येणार आहे. तसेच शहरी व ग्रामीण भागातील छोटे व्यावसायिकांना सुद्धा या वाॅलेटच्या माध्यमातून अतिरिक्त उत्पन्न मिळविता येणार आहे.

दरम्यान बारामती परिमंडल अंतर्गत सोलापूर, सातारा जिल्ह्यात व बारामती मंडलमधील बारामती, इंदापूर, पुरंदर, दौंड, शिरूर, भोर तालुक्यात ठिकठिकाणी महावितरणच्या वाॅलेट नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महावितरणकडून वीजबिलांचा भरणा करण्यासाठी मोबाईल ॲपसह आॅनलाईन सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यानंतर रोजगाराची नवी संधी निर्माण करीत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली महावितरणने स्वतःचे पेमेंट वॉलेट आणले आहे. वाॅलेटद्वारे वीजग्राहकांना स्वतःचे वीजबिल भरता येईल. त्याचप्रमाणे बचत गट, जनरल स्टोअर्स, मेडिकल दुकानदार, किराणा दुकान आदी छोटे-मोठे व्यावसायिक, बचत गट, महावितरणचे वीजबिल वाटप व रिडींग घेणाऱ्या संस्थांना या वाॅलेटद्वारे ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून उत्पन्न मिळविता येणार आहे.

वाॅलेट नोंदणीसाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज उपलब्ध आहे. त्यानंतर संबंधीत उपविभाग कार्यालयाकडून अर्जदारांच्या अर्जांची व जागेची पडताळणी करण्यात येईल. त्यासाठी कोणतेही शुल्क नाही. वाॅलेटधारकाने प्रथम कमीतकमी 5000/- रुपयांचे रिचार्ज करणे आवश्यक आहे. त्यानंतर 1000/- रुपयांच्या पटीत रिचार्ज वाढविता येईल. डेबीट कार्ड, क्रेडीट कार्ड, नेटबॅकींगद्वारे रिचार्जची सोय उपलब्ध आहे. वाॅलेट रिचार्ज केल्यानंतर वाॅलेट ॲपद्वारे महावितरणच्या वीजग्राहकांकडून वीजबिलांची वसुली करता येईल. वीजबिलांचा भरणा केल्यानंतर संबंधीत ग्राहकांच्या संबंधीत मोबाईल क्रमांकावर एसएमएस पाठविला जाईल. विशेष म्हणजे एका वाॅलेटमधील शिल्लक रक्कम वापरून सबवाॅलेटद्वारे एकापेक्षा अधिक व्यक्ती ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करू शकणार आहेत.

महावितरण वाॅलेटमधून ग्राहकांच्या वीजबिलांचा भरणा करून कमिशनच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध झाली आहे. शहरी व ग्रामीण भागातील इच्छुकांनी त्वरीत महावितरणच्या संकेतस्थळावरून आॅनलाईन अर्जाद्वारे नोंदणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे.