पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या 23 नागरिकांना भारताचे नागरिकत्व प्रदान

State Min Dipak Kesarkar at Citizenship Certificates 2
Share this News:

मुंबई, दि. 9/9/2019 : पाकिस्तानमधून भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील 23 नागरिकांना आज गृह राज्यमंत्री (ग्रामीण) दीपक केसरकर व गृह राज्यमंत्री (शहरे) डॉ. रणजित पाटील यांच्या हस्ते भारतीय नागरिकत्वाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

 

पूर्वीपासून पाकिस्तानात राहिलेल्या व आता भारतात स्थलांतरित झालेल्या अल्पसंख्याक समाजातील नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याचे अधिकार केंद्र शासनाने राज्य शासनास प्रदान केले आहेत. या निर्णयानुसार जळगाव, औरंगाबाद, अमरावती व कोल्हापूर जिल्ह्यात वास्तव्यास असलेल्या 23 नागरिकांना आज मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात भारतीय नागरिकत्व प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार गुरुमुख जगवानी, उपसचिव व्यंकटेश भट, उपसचिव युवराज अजेटराव आदी उपस्थित होते.

 

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानातून आता भारतात वास्तव्यास आलेल्या नागरिकांना भारताचे नागरिकत्व देण्याची मागणी होत होती. ही मागणी यानिमित्ताने पूर्ण होत असल्याचा आनंद आहे, अशी भावना श्री. केसरकर व श्री. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.