प्रामाणिकपणे काम करणा-यांच्या मागे जनता उभी : खासदार गिरीष बापट
पुणे, 29/8/2019 : समाजात चांगल्या कामाचा आदर्श निर्माण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी कटीबद्ध आहे. काही दिवसांवर विधानसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यामध्ये तिकीटाचा निर्णय पक्षनेतृत्व घेईल. मात्र, जनतेचे काम करणा-यांना तिकीट मिळेल. प्रामाणिकपणे काम करणा-यांच्या मागे जनता उभी असते, असे मत पुण्याचे खासदार गिरीष बापट यांनी व्यक्त केले.
भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक हेमंत रासने यांच्या नूतनीकरण केलेल्या सदाशिव पेठेतील नातूबाग गणपतीजवळील जनसंपर्क कार्यालयाचे उद््घाटन आणि कार्य अहवाल प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी भाजपा शहराध्यक्षा आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, नगरसेवक राजेश येनपुरे, अॅड.गायत्री खडके, गणेश घोष, धीरज घाटे, महेश लडकत, अजय खेडेकर, सम्राट थोरात, सुहास कुलकर्णी, रासने यांच्या पत्नी मृणाल रासने आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
गिरीष बापट म्हणाले, जनतेची अखंड सेवा करण्याचे व्रत भाजपाच्या नगरसेवक ,आमदार व लोकप्रतिनिधींनी घेतले आहे. त्याप्रमाणेच पुण्यातील १०० हून अधिक नगरसेवक व त्यातीलच एक असलेले हेमंत रासने देखील करीत आहेत. आपल्या प्रभागातील नागरिकांच्या समस्या सोडवून त्यांचे प्रश्न कार्यकर्ता म्हणून ऐकून घेत विकासाची कामे रासने यांनी केली आहेत. तसेच ती कामे कार्य अहवालाच्या माध्यमातून समोर येत आहेत. जनतेचा विश्वास संपादन करणे, हीच विजयाची खरी पावती आहे, असेही त्यांनी सांगितले.
माधुरी मिसाळ म्हणाल्या, काळानुसार जनसंपर्क कार्यालयासह सर्व गोष्टी अपडेट करणे गरजेचे आहे. त्यामुळे हेमंत रासने यांनी देखील आपले कार्यालय अद्ययायवत करुन नागरिकांसाठी खुले केले आहे. भाजपाला जनतेने तावूनसुलाखून सत्ता दिली आहे. हेमंत रासने हे गणेश मंडळाचे कार्यकर्ते असून लोकांच्या मनातील कामे करुन त्यांच्या मनात स्थान निर्माण होतो, असेही त्यांनी सांगितले.
मुक्ता टिळक म्हणाल्या, नगरसेवकांचे जनसंपर्क कार्यालय हायटेक असणे गरजेचे आहे. तसेच हेमंत रासने यांनी केलेले कार्यालय आहे. रामभाऊ म्हाळगी यांनी घालून दिलेल्या आदर्शानुसार आम्ही नागरिकांसाठी केलेल्या कामाचा अहवाल प्रकाशित करतो. त्यामुळे कार्य अहवालात केलेल्या कामांप्रमाणे यापुढेही नागरिकांच्या समस्या सोडविण्याकरीता आम्ही उपलब्ध राहू.
हेमंत रासने म्हणाले, भारतीय जनता पार्टी व श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून झालेल्या संस्कारांमुळे मी तयार झालो आहे. मागील १५ वर्षे नगरसेवक म्हणून कामाची मला संधी मिळाली. सामाजिक व राजकीय जीवनात कार्यरत असताना चांगला जनसंपर्क निर्माण केला. आधीच्या कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने प्रलंबित ठेवलेले विषय आम्ही मार्गी लावले. सेवाभावाने काम करणे ही शिकवण आम्हाला भाजपाने दिली आहे. पक्षाकडून जे काम व जी संधी मिळेल, त्याप्रमाणे भविष्यात देखील काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अशोक गोडसे, राजेश येनपुरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रमोद कोंढरे यांनी सूत्रसंचालन केले. गायत्री खडके यांनी आभार मानले.
