पुणे परिमंडलातील 27.49 लाख वीजग्राहकांना ‘एसएमएस’द्वारे सेवा

Share this News:

पुणे, दि. 18 जून 2019 : महावितरणकडे ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेल्या पुणे परिमंडलातील 27 लाख 49 हजार वीजग्राहकांना वीजपुरवठा, वीजबिलांसह इतर विविध माहितीचा तपशील ‘एसएमएस’द्वारे देण्यात येत आहे. उर्वरित वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणकडून वीजग्राहकांना वेळोवेळी ‘एसएमएस’द्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे. यामध्ये पूर्वनियोजित देखभाल व दुरुस्तीसाठी वीजपुरवठा बंद राहणार असल्याचा कालावधी, नैसर्गिक आपत्ती, तांत्रिक बिघाड किंवा विविध कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची व वीजपुरवठा पूर्ववत होण्याचा संभाव्य कालावधी, दरमहा वीजबिलाची रक्कम, देय दिनांक आदींचा तपशील, मीटर रिडींग घेण्याची तारीख व कालावधी, मीटर रिडींग घेतल्याची तारीख व एकूण युनिटचा वापर, वीजबिलाची मुदत उलटून गेल्यास त्यासंबंधीची माहिती, वीजपुरवठा खंडित करण्याची नियमाप्रमाणे नोटीस आदींची माहिती निशुल्क देण्यात येत आहे.

यासोबतच ‘एसएमएस’द्वारे मिळालेल्या वीजबिलाच्या तपशिलावरून वीजग्राहकांना देयकाचा भरणा करणे शक्य झाले आहे. महावितरणच्या वीजबिल भरणा केंद्रात ‘एसएमएस’ दाखवून वीजबिलाचा भरणा करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे. तसेच वीजग्राहकांच्या मागणीनुसार मराठी भाषेतून सुद्धा ‘एसएमएस’ उपलब्ध आहे. पुणे परिमंडल अंतर्गत पुणे, पिंपरी चिंचवड शहर तसेच मुळशी, मावळ, खेड, आंबेगाव, जुन्नर, वेल्हे तालुक्यात एकूण 29 लाख 26 हजार वीजग्राहक आहेत. यापैकी 93.92 टक्के म्हणजे 27 लाख 48 हजार वीजग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केलेली आहे.

महावितरणच्या 9225592255 या क्रमांकावर ‘एसएमएस’द्वारे मोबाईल क्रमांकाची नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे. उर्वरित वीजग्राहकांनी नोंदणी करावयाच्या मोबाईल क्रमांकावरून 9225592255 क्रमांकावर MREG(स्पेस)(बारा अंकी ग्राहक क्रमांक) अशी माहिती टाईप करून ‘एसएमएस’ केल्यास मोबाईल क्रमांकाची नोंदणी होते. याशिवाय 24×7 सुरु असणाऱ्या कॉल सेंटरचे 1912 किंवा 18001023435 आणि 18002333435 हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे. याशिवाय www.mahadiscom.in या संकेतस्थळावरून किंवा महावितरण मोबाईल अ‍ॅपद्वारे मोबाईल क्रमांक नोंदणी करण्याची सोय उपलब्ध आहे.

चौकट- वीजवापरकर्त्यांनी मोबाईल क्रमांक नोंदणी करावी – वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधीत वीजवाहिनीवरील ग्राहकांना महावितरणकडून ‘एसएमएस’द्वारे वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती व दुरुस्तीसह वीजपुरवठा कधी सुरु होणार याची माहिती तात्काळ दिली जाते. मात्र काही वीजवापरकर्ते हे भाडेकरू म्हणून राहत आहेत. परंतु त्यांच्या ग्राहक क्रमांकासोबत घरमालकाच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी केल्याचे प्रामुख्याने वाघोली, हिंजवडी, वाकड, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, विश्रांतवाडी, विमाननगर, खराडी आदी परिसरात दिसून येत आहे. त्यामुळे महावितरणकडून येणारे ‘एसएमएस’ हे घरमालकाच्या मोबाईलवर जात अाहेत व प्रत्यक्षात वीजवापर करणाऱ्या भाडेकरूंना वीजसेवेबाबत कोणतीही माहिती उपलब्ध होत नाही. त्यामुळे वीजवापरकर्त्यांनीच किंवा भाडेकरूंनी संबंधीत ग्राहक क्रमांकासोबत मोबाईल क्रमांकाची नोंदणी करावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.