शेतकर्‍यांना खोटे आवतन देणाऱ्या भाजप सरकारला हद्दपार करा – शरद पवार

Share this News:

नाशिक दि. ४ मार्च -देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आलेली असताना उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्याला पुन्हा खोटे आवतन देणाऱ्या या भाजपा सरकारला हद्दपार करा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.

नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा-मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडेच नाशिकची संपूर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकासपुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे रहा असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

राजकीय गरज भागविण्यासाठी भाजपाने देशात जी आपत्ती आणली आहे, तिचे निवारण करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या भूमिकेवर माझी शंका आहे. त्यामुळे बूथप्रमुखांनी सतर्क राहून काम करावे आणि सकाळीच मतदानयंत्रे तपासून घ्यावी. कारण ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्या हातातून ती जात असल्याने भाजपा रडीचा डाव खेळण्याचा प्रयत्न करणार आहे अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी कार्यकर्त्यांसमोर मांडली.

ज्या राज्यांत भाजपाची सत्ता होती, ती राज्ये भाजपाच्या हातातून गेली आहेत. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत परिवर्तन होणारच असा ठाम विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ म्हणाले की, पराक्रमी सैन्य आपल्या देशाला लाभले आहे. यशवंतराव चव्हाण यांनी संरक्षण खात्याला अधिक बळकटी दिली. या अगोदरही अनेक लढाया झाल्या, मात्र कुठल्याही पक्षीय राजकारणात त्यांचा कधीही वापर केला गेला नाही. मात्र सध्याचे मोदी सरकार सैन्याच्या कारवाईचेही राजकारण करण्याचा प्रयत्न करते आहे असा आरोप केला.

देशात प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये नाशिक सोळाव्या स्थानी होते आणि मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यावर नुकत्याच आलेल्या अहवालातून नाशिक गायबच झाले आणि त्याची जागा नागपूरने घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेले नाशिक गायब झाले कुठे, असा सवालही आमदार छगन भुजबळ यांनी केला.

माझ्यावर कुठलेही आरोप होतात, तेव्हा आधी आरोप समीरवर करायचे असे षडयंत्र विरोधकांनी नेहमीच रचले आहे. माझ्यासोबत समीरलाही अटक करून मला संपवण्याचा कट रचण्यात आला.भुजबळांना कमजोर करायचं असेल तर समीरला कमजोर करा हे षडयंत्र आहे. पण मी किंवा समीर असल्या कारस्थानांना पुरून उरू असे सांगतानाच जोपर्यंत कार्यकर्ते आणि नाशिकच्या जनतेचे प्रेम सोबत आहे तोपर्यंत लढतच राहू असा इशाराही आमदार छगन भुजबळ यांनी यावेळी दिला.

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांचीही भाषणे झाली.

या कार्यक्रमाला माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, माजी मंत्री प्रशांत हिरे,माजी खासदार समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आमदार हेमंत टकले,आमदार पंकज भुजबळ, आमदार नरहरी झिरवाळ, माजी आमदार जयवंत जाधव, डॉ. अपूर्व हिरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, शहराध्यक्ष रंजन ठाकरे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.