दिवसा व रात्री 12 तास वीजपुरवठ्याची अंमलबजावणी राज्यभर सुरू

Share this News:

प्रभावी अंमलबजावणीचे क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना आदेश

मुंबई, दि. 09 सप्टेंबर 2016 :

राज्यातील शेतकर्‍यांच्या शेतातील उभ्या पिकांचे पाण्याअभावी नुकसान होऊ नये म्हणून महाराष्ट्र शासनाने शेतकर्‍यांना 8 तासांऐवजी 12 तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. त्यानुसार राज्यातील शेतकर्‍यांना 12 तास वीजपुरवठा दिला जात असून त्यासाठी महावितरणच्या यंत्रणेत आवश्यक ते बदल करण्यात आलेले आहेत. शेतकर्‍यांना योग्यप्रकारे वीजपुरवठा मिळांवा यासाठी महावितरणने क्षेत्रीय अभियंत्यांना प्रभावीपणे अंमबजावणी करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

राज्यात जुलै आणि 15 ऑगस्टपर्यन्त समाधानकारक पाऊस होता. परंतु मागील दोन-तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकर्‍यांच्या शेतातील उभी पिके करपण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर परिस्थितीची दखल शासनाने घेतली असून पाण्याची आणि विजेची उपलब्धता असल्यामुळें कृषिफिडरवरील शेतकर्‍यांना 8 तासांऐवजी 12 तास वीजपुरवठा करण्याचे आदेश महावितरणला दिले आहेत. यानुसार दि. 8 सप्टेंबरपासून या निर्णयाची मागणीप्रमाणे राज्यात अंमलबजावणी सुरू झालेली आहे.

राज्यातील कृषिप्राबल्य असलेल्या 16 पैकी 13 परिमंडलात कृषिग्राहकांना दरदिवशी 12 तास चक्राकार पध्दतीने थ्रीफेजची वीज उपलब्ध करून देण्यात येत आहे. याबाबत महावितरणने क्षेत्रीय मुख्य अभियंत्यांना निर्देश दिले असून त्यात तांत्रिक कारणांमुळे कुठे वीजपुरवठा करताना अडचणी आल्यास त्या तातडीने दूर करूंन 12 तास वीजपुरवठा मिळेंल याची दक्षता घेण्याबाबतही सूचना देण्यात आलेल्या आहेत. तसेच काही कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची भरपाई लगतच्याच दिवसात करण्याचे निर्देशही मुख्य अभियंत्यांना दिलेले आहेत. या आदेशानुसार राज्यात कृषिग्राहकांना 8 तासांऐवजी 12 तास वीजपुरवठा करण्यात येत आहे.