आंबेगाव तालुक्यातील ३१२ नागरिक आपापल्या जिल्ह्यात रवाना

Share this News:

पुणे, दि. ११- लॉकडाऊनमुळे आंबेगाव तालुक्यात अडकून पडलेल्या कामगार व मजूरांना सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्याच्या तहसिलदार रमा जोशी आणि संपूर्ण तालुका महसूल प्रशासनाने विशेष नियोजन करून महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यात रवाना केले.

 

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी पुणे जिल्ह्यातील विविध तालुक्यात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांना त्यांच्या मूळ गावी पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार जिल्हा आणि उप विभागीय स्तरावर उत्कृष्ट नियोजन करण्यात येत आहे.

 

आंबेगाव तालुक्यात अडकलेल्या ३१२ प्रवाशांना ११ एसटी बसच्या सहाय्याने त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवण्यात आले. काल उशिरापर्यंत नागरिक रवाना करण्यात येत होते. शेवटची बस रात्री 11 वाजता मार्गस्थ करण्यात आली. आवश्यकतेनुसार आणखी बस सोडण्यात येणार असल्याचे सहायक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सांगितले.

 

या मजुरांना रवाना करतांना त्यांचे थर्मल स्क्रीनिंग तसेच प्राथमिक तपासणी करण्यात आली. सोशल डिस्टन्सिंगचे पालन, मास्क वापरणे या बाबींचा अवलंब करण्यात आला.