नदी जोड, सिंचन विकास प्रकल्पांतील गुंतवणुकीसाठी जपानच्या कंपन्यांनी पुढे यावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुबंई, दि. २२ : दुष्काळ मुक्त महाराष्ट्र हे यापुढचे उद्दीष्ट आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील नदी जोड आणि सिंचन विकास प्रकल्पात जपानच्या कंपन्यांनी गुंतवणूकीसाठी पुढे यावे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
जपानचे भारतातील विशेष राजदूत केनजी हिरामत्सू यांनी आज सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी नंदकुमार आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, ‘राज्यातील ५२ टक्के भूप्रदेश हा अवर्षणग्रस्त आहे. उर्वरित ४८ टक्के प्रदेशात काही प्रमाणात निश्चित असा पाऊस होतो. पण या पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात समुद्रात जाते. दुसरीकडे मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ दरवर्षी अवर्षणाला तोंड देत असतो. त्यामुळे समुद्रात वाहून जाणारे पाणी रोखून ते विविध मार्गांनी या अवर्षणग्रस्त प्रदेशात कसे पोहचविता येईल, असे प्रयत्न करण्यात येतील. यासाठी नदी जोड, वॅाटर ग्रीड अशा विविध उपाय योजना राबविण्याचा प्रय़त्न आहे. यामुळे या अवर्षणग्रस्त भागाला दिलासा मिळणार आहे. शाश्वत अशा सिंचन सुविधा निर्माण करता येणार आहेत. यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असेल. यासाठी जपानमधील कंपन्यांना आणि गुंतवणूकीला मोठी संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.’
‘जपानने राज्यातील महत्त्वाकांक्षी अशा अनेक प्रकल्पांना अर्थसहाय्य देऊ केले आहे. त्यामध्ये मेट्रो आणि स्मार्ट सिटीज प्रकल्पांचा समावेश आहे. या योजना- प्रकल्पांतील जपानचे सहकार्य असेच कायम राहील, पण त्यापुढे जाऊन नदी जोड आणि सिंचन प्रकल्पातही जपानच्या कंपन्यांना गुंतवणूकीची संधी आहे. त्यासाठी त्यांनी पुढे यावे,’ असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी केले.
जपानचे राजदूत श्री. हिमामत्सू म्हणाले, ‘जपान आणि भारताचे विविध क्षेत्रातील सहकार्य हे सुदृढ असेच आहे. अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्पात उभय देश भागीदार आहेत. मेट्रो, हायस्पीड रेल्वे यांच्यासह अन्न-प्रक्रिया उद्योग, सांस्कृतिक तसेच पर्यटन अशा क्षेत्रातही जपानने सहकार्य देऊ केले आहे. महाराष्ट्र हे औद्योगीक तसेच कृषी क्षेत्राच्या दृष्टीनेही प्रगत राज्य आहे. त्यामुळे राज्यातील सिंचन सुविधा निर्मितीतील प्रकल्पांचे महत्त्व मोठेच असेल. यासाठी मोठ्या गुंतवणूक संधी असणाऱ्या सिंचन सुविधा निर्मिती प्रकल्पातही जपानला निश्चितच स्वारस्य असेल.’
यावेळी श्री. हिरामत्सू यांनी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतनही केले.