दोन दिवसात नुकसानीचे पंचनामे पूर्ण करणार -विभागीय आयुक्त डॉ म्हैसेकर

Share this News:

पुणे दि. 6: पुणे विभागात अतिवृष्टीमुळे 1 लाख 89 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून बुधवार सकाळ पर्यंत 90 हजार हेक्टरवरील पिकाचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. येत्या दोन दिवसात सर्व बाधीत क्षेत्राचे पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून ते शासनाला सादर करण्यात येणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

डॉ म्हैसेकर यांनी आज पुणे जिल्ह्यातील खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागातील पिकांची पाहणी केली. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब पलघडमल, उपजिल्हाधिकारी अजय पवार, उपविभागीय कृषी अधिकारी संगीता माने, आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी, जुन्नरचे तहसीलदार हनुमंत कोळेकर, आंबेगावचे गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, जुन्नरचे गटविकास अधिकारी विकास दांगट, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब मांदळे, टी. के. चौधरी, सतीश शिरसाट उपस्थित होते.

डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक 74 हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे, त्या खालोखाल सांगली जिल्ह्याला फटका बसला आहे. सोलापूर जिल्ह्यात सोयाबीनचे, सांगली जिल्ह्यात द्राक्ष-डाळिंबाचे, सातारा जिल्ह्यात भाताचे तर पुणे जिल्ह्यात कांदा, बटाटा, सोयाबीन, भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या सर्व क्षेत्राचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, त्यानुसार वेगाने काम सुरू आहे. दोन दिवसात पंचनामे पूर्ण करण्यात येणार असून त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळू शकेल.

जिओ टॅगिंगचा वापर

शेतकऱ्यांना विमा कंपन्याकडून भरपाई मिळण्यासाठी अडचण येऊ नये यासाठी जिओ टॅगिंगचा वापर करून फोटो काढून पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच याबाबत विमा कंपन्याच्या अधिकारी-प्रतिनिधींची बैठक घेऊन शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रब्बीसाठी तातडीने कर्ज

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यांना रब्बी हंगामासाठी तातडीने कर्ज देण्याच्या बँकांना सूचना देण्यात आल्या आहेत. यासाठी बँकांच्या प्रतिनिधीची बैठक घेण्यात आली असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज खेड तालुक्यातील वडगाव (घेनंद) येथील संपत भिकू बवले, ज्ञानेश्वर बवले, रामचंद्र मधुकर कुलकर्णी, बबन नरहरी घेनंद-पाटील यांच्या शेतातील कोबी, मका, सोयाबीन, भुईमूग, बीट या पिकांच्या नुकसानीची पहाणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.

तसेच आंबेगाव तालुक्यातील पेठ येथील सुरेश धोंडिबा धुमाळ आणि जयंत काशिनाथ थिटे यांच्या शेतातील बटाटा, कांदा, मका या पिकांची पहाणी केली. एकलहरे गावातील प्रमोद ढमाले यांच्या शेतीची पाहणी केली.
जुन्नर तालुक्यातील सावरगाव-आर्वी येथील शांताराम कोरडे, पिंपळगाव तर्फे नारायणगाव येथील विठ्ठल खांडके, हिराबाई खांडके, गुंजाळवाडी येथील तुळशीराम ढवळे यांच्या शेतीची पाहणी केली.