राज्यात आणखी 12 जण कोरोना बाधितराज्यातील एकूण रुग्णसंख्या 64 : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

Share this News:

मुंबई, दि. 21/03/2020: कोरोनाचे राज्यात आज एकूण 12 नवीन रुग्ण आढळले असून यामुळे राज्यातील एकूण बाधित रुग्णांची संख्या 64 झाली आहे. त्यामध्ये 8 रुग्ण मुंबई येथील तर 2 जण पुणे येथील आहेत. प्रत्येकी 1 रुग्ण यवतमाळ आणि कल्याण येथील आहेत, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले.

मुंबईत आढळलेल्या 8 रुग्णांपैकी 6 जणांचा परदेश प्रवासाचा इतिहास आहे तर एक जण विमानतळावर काम करणारा कर्मचारी असून आणखी एक रुग्ण गुजरातमध्ये प्रवास केलेला आहे. यवतमाळ येथील असणारा पण मुंबईत भरती असलेल्या रुग्णाने कांगो देशाचा प्रवास केलेला आहे. कल्याण येथील कोरोना बाधित रुग्ण हा दोन दिवसांपूर्वी बाधित आढळलेल्या आणि दुबई प्रवासाचा इतिहास असलेल्या उल्हासनगर येथील तरुणीचा भाऊ आहे. तो स्वतः ही बहिणीसोबत दुबईला गेला होता. पुणे येथील 25 वर्षाच्या बाधित तरुणाने इंग्लंड आणि आयर्लंड येथे प्रवास केलेला आहे. दरम्यान, कुठलाही परदेश प्रवासाचा इतिहास नसलेली एक 41 वर्षाची पुण्यातील महिला कोरोना बाधित आढळलेली आहे. हा रुग्ण बाधित येण्यामागील कारणमीमांसा तिच्या साथरोगशास्त्रीय अन्वेषणानंतर स्पष्ट होईल.

राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील असा:

  • पिंपरी चिंचवड मनपा –            12
  • पुणे मनपा     –                11 (दि. 21 मार्च रोजी 2 रुग्ण आढळले)
  • मुंबई           –                         19 (दि. 21 मार्च रोजी 8 रुग्ण आढळले)
  • नागपूर     –            04
  • यवतमाळ, कल्याण प्रत्येकी    04  (दि.21 मार्च रोजी प्रत्येकी 1 रुग्ण आढळले)
  • नवी मुंबई                03
  • अहमदनगर                           02
  • पनवेल, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी १

 एकूण  64 (मुंबईमध्ये एक मृत्यू)

राज्यात आज एकूण 275 परदेशातून आलेले प्रवासी सर्वेक्षणाखाली दाखल झाले आहेत. राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1861 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 1592 जणांना भरती करण्यात आले होते. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 1208 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 64 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

कोरोना आजार होण्याच्या भितीने अनेकांनी आपल्याकडील पाळीव प्राणी सोडून देण्यास सुरुवात केली आहे,अशा तक्रारी हेल्पलाईनवर प्राप्त होत आहेत. पाळीव प्राण्यांपासून कोरोना संसर्ग झाल्याची कोणतीही उदाहरणे नाहीत, त्यामुळे लोकांनी घाबरुन आपले पाळीव प्राणी सोडून देऊ नयेत, असे आवाहन आरोग्य विभागामार्फत करण्यात आले आहे.