कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट, 6660 खाटांची उपलब्धता : राजेश टोपे

Tope
Share this News:

मुंबई, दि. 18/04/2020: कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली. त्यानंतर आरोग्य विभागाने नव्याने आठ रुग्णालये तर वैद्यकीय शिक्षण विभागाने १७ रुग्णालये अधिसूचित केली आहेत. त्यामुळे अतिरीक्त 4355 खाटांची उपलब्धता झाली आहे. पूर्वी घोषीत केलेल्या 30 रुग्णालयातील 2305 खाटा आणि आताच्या 4355 खाटा अशा राज्यात एकूण 6660 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली.

दोन्ही विभागांनी काढलेल्या अधिसूचनांमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाच्या संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्री श्री.टोपे यांनी यावेळी सांगितले.

आरोग्य विभागाने 31 मार्च रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार विभागाच्या अखत्यारीतील 30 रुग्णालये विशेष उपचारासाठी घोषित केले होते. त्यानंतर पुन्हा 6 एप्रिल रोजी ठाणे जिल्हा रुग्णालय, उल्हासनगर रुग्णालय क्र.4, पालघर ग्रामीण रुग्णालय, नंदुरबार, जालना, बीड आणि नांदेड जिल्हा रुग्णालय आणि मूर्तिजापूर उपजिल्हा रुग्णालय अधिसूचित झाल्याने त्यामधील एकूण 630 खाटांची उपलब्धता झाली आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाच्या पुणे, बारामती, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, गोंदिया, चंद्रपूर, धुळे, लातूर, नांदेड, मिरज, औरंगाबाद, जळगाव आणि अंबाजोगाई येथील वैद्यकीय महाविद्यालयातील रुग्णालये अधिसूचित केली आहे. त्यामुळे एकूण 3725 खाटा कोरोना बाधीतांसाठी उपलब्ध झाल्या आहेत.