Sanatan Sanstha made soft target in Gauri Lankesh murder case

Share this News:

गौरी लंकेश हत्येप्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट बनवून हिंदुत्वनिष्ठांना गोवण्याचे षड्यंत्र !

फोंडा (गोवा) – वामपंथीय विचारसरणीच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्यकर्त्यांना अटक केल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध होत आहेत. या हत्येप्रकरणी गौरी लंकेश यांचे सख्खे भाऊ इंद्रजीत हे सातत्याने गौरी लंकेश यांच्या हत्येला कर्नाटकातील तत्कालीन काँग्रेसचे सिद्धरामय्या सरकार उत्तरदायी आहे, असे जाहीरपणे सांगत आहेत. गौरी लंकेश यांचे नक्षलवाद्यांशी असलेले संबंध आणि काँग्रेस सरकारच्या काळात लयाला गेलेली कायदा सुव्यवस्थेची स्थिती, हे त्यांच्या हत्येस कारणीभूत आहेत, असे त्यांनी प्रसिद्धीमाध्यमांनाही सांगितले आहे. निवडणुकीला काही काळ असतांना सिद्धरामय्या सरकारला गौरी लंकेश हत्येच्या प्रकरणी कुठलेही धागेदोरे सापडत नसतांना अचानक हिंदु युवा सेनेचे प्रमुख के.टी. नवीनकुमार यांना आणि त्यांच्या ३ कार्यकर्त्यांना शस्त्रविक्री करण्याच्या खोट्या आरोपाखाली अटक करण्यात आली. काही दिवसांनी त्या ३ कार्यकर्त्यांना पोलिसांनी सोडून दिले. त्यानंतर या कार्यकर्त्यांनी प्रसारमाध्यमांकडे जाऊन के.टी. नवीनकुमार यांचा या हत्येशी कुठलाही संबंध नसून पोलिसांनी मारहाण करून आमच्याकडून बळजोरीने हे सर्व लिहून घेतले, असे सांगितले. दुर्दैवाने आमच्याकडील निधर्मी पत्रकारांनी या महत्त्वाच्या घटनेला कुठलीही प्रसिद्धी दिली नाही.

यानंतर कर्नाटकातील निवडणुका घोषित झाल्या. त्यानंतर विशेष तपास पथकाकडून होणारा तपास थंडावला. कर्नाटकातील निवडणुका पार पडल्या आणि भाजप बहुमत मिळूनही सत्तेत येऊ शकणार नाही, हे स्पष्ट झाले. भाजपच्या अल्पकालीन मुख्यमंत्र्यांना त्यागपत्र द्यावे लागले. त्या वेळी पुन्हा काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) या निधर्मी पक्षांचे सरकार सत्तेवर येणार, हे स्पष्ट झाले. त्यानंतर त्वरित विशेष तपास पथक सक्रीय झाले आणि सनातन संस्था अन् हिंदु जनजागृती समिती यांच्याशी काही वर्षांपूर्वी संबंधित असणार्‍या कार्यकर्त्यांना के.एस्. भगवान या धर्मद्रोही लेखकाची हत्या करण्याचा कट केल्याप्रकरणी अटक करण्यात आली; म्हणजे हत्येची काल्पनिक कथा रचून त्यांना या प्रकरणी गोवण्यात आले. आता त्यांना गौरी लंकेश हत्येप्रकरणी अटक केल्याचे पोलीस सांगत आहेत. या हत्येचा आरोप करतांना हत्येशी संबंधित कुठलाही प्रत्यक्ष पुरावा आजवर सादर करण्यात आलेला नाही. या ठिकाणी विशेष तपास पथक हे जणूकाही सत्तेवर येणार्‍या सरकारच्या विचारसरणीप्रमाणे तपास करत आहे, असा संशय घेण्यास जागा आहे. हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या 23 हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांची याच कर्नाटक राज्यात निर्घृणपणे हत्या करण्यात आली; मात्र एकाही प्रकरणात अशाप्रकारे अन्वेषण करण्यात आले नाही. या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या हत्येच्या प्रकरणात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक होऊनही पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाला कोणीही आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करत नाही; मात्र सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांना सॉफ्ट टार्गेट बनवून चोर सोडून संन्याशाला फाशी दिली जात आहे. सेक्युलरवादाच्या नावाखाली हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि कार्यकर्ते यांना संपवण्याचे हे षड्यंत्र आहे.